अमर कविता

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

पानाफुलातुन, वृक्षवेलीतुन घडते माझी कविता
कोण्या कळीला उमलून येता स्मरते माझी कविता


फेकुन दिलेल्या बुज-या कळीला जीवन मिळते कारण...
काट्याकुट्यातुन, दगडधोंड्यातुन फिरते माझी कविता


कित्येक भिजले या आसवांनी पण खंत नसे कारण...
अश्रुही घेतो हसूनी जेंव्हा कळते माझी कविता


कवितेस माझ्या घेऊन बोटी तरती सागर कारण...
बेधुंद लाटा येतात तेंव्हा भिडते माझी कविता


पणतीस नाही उरलीच भीती आता विझण्याचीही...
कारण, सदोदित वातीबरोबर जळते माझी कविता


कोणांस होते अमर व्हायचे नि आले माझ्या दारी...
कारण, कुणाही...केंव्हा...कधीही मिळते माझी कविता

गझल