बेसुरी सुरुवात झाली जीवनाची
फक्त आलापीच आहे.. वेदनांची
भैरवी आधीच... मैफल संपवावी
ही प्रथा नाहीच कुठल्या गायनाची
ताल हा... धरलाच आहे तू चुकीचा
सम तरी सांभाळ आता... वादनाची
सूर हे जुळतील आता सांग कुठुनी ?
तार ही तुटली तुझ्या-माझ्या मनाची
वेदनेचा... षडज-पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची
बासरी जमवायची ती... गोपगोपी
वाढली वर्दळ कशाने ? यातनांची
दाद अश्रुंनी दिली.. या मैफिलीला
शेवटी तू ओळ गावी... सांत्वनाची
ही गझल वाचून आता वाटते की;
गरज तर आहे मलाही चिंतनाची
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा